‘सध्या पैसे आणि निधीवर मतं मागितले जात आहेत’; शरद पवारांचा आरोप

Sharad Pawar | तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा, तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत बोलताना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत जोरदार टीका केली आहे.
निवडणुकीत वारंवार नेत्यांकडून निधीचा उल्लेख केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, सध्या जी काही चढावढ चालली आहे की किती पैसे द्यायचे? मतं मागताना कामावर मतं मागितली जात नाहीत. मी पैसे देईल, मी निधी देईल अशा गोष्टींवर सध्या मतं मागितली जात आहेत, पण ही गोष्ट चांगली नाही. शेवटी अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टीकोन असेल तर त्यावर न बोललेलं बरं.
हेही वाचा : River Improvement Project : ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध!
अतिवृष्टीनंतर ज्यांची जमीन वाहून गेली, त्यांना काही ना काही आर्थिक मदत करून पुन्हा उभं राहण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती मदत करण्याची गरज होती. यातच आता राज्य सरकारने असं धोरण ठरवलंय की त्यांच्या कर्जाच्या वसुलीला एका वर्षांसाठी स्थगिती दिली आहे. एक वर्ष कर्जाच्या वसुलीला स्थगिती देणं हे तात्पुरतं उपयोगी पडेल. पण त्यांची गरज भागणार नाही. मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते पाहता त्यातील काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती. तसेच काही रक्कमेवर व्याज माफ करून दिर्घ हप्ते दिले असते तर शेतकऱ्यांची अधिक मदत झाली असती. पण सरकाने दिलेली मदत ही पुरेशी आहे, असं मला वाटत नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.




