‘महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल’; शरद पवरांकडून चिंता व्यक्त
![Sharad Pawar said that something like Manipur will happen in Maharashtra too](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sharad-Pawar-6-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी, आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल, अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्रात देशाल दिशा दाखवणारे अनेक युगपुरूष जन्माला आले. त्यामुळे महाराष्ट्र अजून स्थिर आहे. पंरतु, आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे.
शरद पवार म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही घडले त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एकदाही तिकडे जावं असं वाटलं नाही. ते तिकडे गेले नाहीत. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं. कर्नाटकातही घडलं, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराषट्राला दिशा देणारे अनेक युगपुरूष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिलं आहे.
हेही वाचा – Pune | पीएमपी कर्मचाऱ्यांचा संप, पुणेकरांची मोठ्याप्रमाणात गैरसोय
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य हे भोसल्याचं राज्य किंवा शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. तर ते रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं गेलं. राज्यातील सर्वसामान्यांचं हे राज्य आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून हेच सूत्र आपल्यासमोर मांडलं आहे. आपण त्याचं पालन करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.
शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांमुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे. परंतु, अलीकडच्या काळात इथली परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे त्यात आता बदल करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला तो बदल करायचा असेल तर जात, पंथ, धर्म व भाषा या गोष्टी बाजूला ठेवून आपण एकत्र यायला हवं. एकसंघ समाज व एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन आपल्याला एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. माझ्या मते ही ऐक्य परिषद यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावू शकते, असंही शरद पवार म्हणाले.