‘मोदींनी सभा घेतलेल्या १० ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले’; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
![Sharad Pawar said that his candidates fell in 10 places where Modi held meetings](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sharad-Pawar-2-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर शेतकरी मेळावे घेत आहेत. गुरूवारी त्यांनी बारामतीमधील मोरगाव या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे १८ दौरे केले. परंतु, त्या बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की त्यांनी ज्या १८ ठिकाणी सभा घेतल्या. त्यातले दहा उमेदवार पडले, असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
शरद पवार म्हणाले, मी उद्या दिल्लीला जाऊन मोदी यांना भेटून सांगेन तुम्ही महाराष्ट्रात जिथे जिथे गेलात तिथले ६० टक्के उमेदवार पडले. उद्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे तेव्हाही तुम्ही महाराष्ट्रात फिरा. मोदी या निवडणुकीत सतत मेरी गॅरंटी..मेरी गॅरंटी..असं ओरडत होते. परंतु, ते कोणी ऐकलं नाही. मोदींच्या गॅरंटीवर कोणाचा विश्वास बसला नाही. त्यांचं नाणं महाराष्ट्रात काही चाललं नाही. त्यांची गॅरंटी भाजपाच्या कामाला आली नाही.
हेही वाचा – पशुवैद्यकीय क्षेत्रातील विकास आणि संशोधनासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त – डॉ. नीलम गोऱ्हे
इथे यायचं कारण म्हणजे नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत काही लोकांनी दमदाटी केली, नवीन पिढीतल्या लोकांना आवर घालण्याचे काम काही लोकांनी केले. निवडणुकीच्या प्रचाराला गावात गेल्यानंतर गावातले जे पुढारी होते त्यांचा काही पत्ता लागला नाही, कुठे गायब झाले माहित नाही. नव्या पिढीने ताबा घेतला. माळेगाव कारखाना असेल, सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक असतील, जिल्हा बँक असो, पंचायत समिती असो किंवा बारामतीचे दूध संघ असो या संस्थांमध्ये जे जे काम करतात त्यातील बहुसंख्य लोक या निवडणुकीत दिसतच नव्हते. काय भानगड होती मला माहित नाही. नंतर चौकशी केली की लोक कोण होते? कोणी सांगितलं की कोणी कारखान्याचे डायरेक्टर. हळू चौकशी केली पोलिसांकडून आणि पोलिसांना विचारलं हे कोण होते. त्यांनी सांगितलं काय विचारू नका, त्यांचा धंदा होता हॉटेलचा तिथे काहीतरी दुसरंच बघायला मिळालं. लॉजिंगचा धंदा होता तिथे भलतेच लोक राहायला येतात याची बातमी आली. मला आश्चर्य वाटलं मोरगावला महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक अष्टविनायकाचे दर्शन घ्यायला येतात त्याची सुरुवात मोरगाव पासून होते. अशा पवित्र ठिकाणी लॉजमध्ये दुसराच धंदा चालतो अशी चर्चा बाहेर होणे हे या पवित्र ठिकाणाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? हीच मंडळी कालच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या कामात गुंतली होती, असं शरद पवार म्हणाले.
यावेळची निवडणूक ही सामान्य लोकांनी, तरुण पिढ्यांनी, कष्टकऱ्यांनी हातात घेतली होती. मी स्वतः, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र माझ्या घरी बसलो आणि आम्ही ठरवलं की आपण तिघांनी मिळून निवडणूक लढायची. मोदींनी महाराष्ट्रामध्ये १८ दौरे केले, १८ ठिकाणी सभा केल्या. मला सांगायला वाईट वाटतं की ज्या १८ ठिकाणी ते गेले त्यातील दहा ठिकाणी त्यांचा उमेदवार पडला. म्हणून परवा मी सांगितलं की मी दिल्लीला जाईन त्या वेळेला भेटून सांगेन मोदी साहेब तुम्ही जिथे जिथे गेलात तिथे ६० टक्के लोक पराभूत होतात. उद्या आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. तुम्ही जास्त तिथे या म्हणजे काय होतं ते आम्हाला बघायला मिळेल, असंही शरद पवार म्हणाले.