‘देवेंद्र फडणवीसांच माफी म्हणजे एक प्रकारे कबुलीच’; शरद पवार यांचा हल्लाबोल

मुंबई : जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला. याचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या जखमींची माफी मागितली. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीसांच माफी म्हणजे एक प्रकारे त्यांची कबुलीच आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, ओबीसींच्या कोट्यातून आणखी वाटेकरी करणं हे सुद्धा ओबीसी गरीब लोकांवर अन्याय होईल, असं काही लोकांच म्हणणं आहे. हे एकदम दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्याला पर्याय हा आहे की, आज जी ५० टक्क्यांची अट आहे, यात आणखी १५ ते १६ टक्क्यांची वाढ करण्यासंदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली, तर हे प्रश्न सुटतील. ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद नको, त्यांच्यात वाद करायचा कुणी प्रयत्न करत असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा नाही.
हेही वाचा – महापालिका शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता ‘धन्वंतरी’चा लाभ!
अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत विरोधकांना चॅलेंज दिलं. आम्हा तिघांपैकी एकाने जरी गोळाबाराचे आदेश दिले असतील तर राजकारण सोडतो. पण तसं घडलं नसेल तर त्यांनी राजकारण सोडावं, असं अजित पवार म्हणाले. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. मला इतकं माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथं पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसतं. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.





