शरद पवार यांचा भाषणातून आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा; म्हणाले..
पुणे | शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी अजित पवार गटातील जवळपास १३७ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, या कार्यक्रमाला कुणही जाऊ नये असा इशारा अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी दिला होता. यावरून स्वत: शरद पवार यांनी आमदार सुनील शेळकेंचा समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले की, देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचने आठवं समन्स धाडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्यानंतर भाजपाची आता दिल्लीवर नजर आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तर ‘सामना’चे (शिवसेनेचं मुखपत्र) संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात अडकवलं होतं. कारण राऊत हे सामनातून भाजपावर टीका करतात. म्हणजे या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही.
हेही वाचा – PM किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळवण्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे आवश्यक
मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदाराने (मावळचे आमदार सुनील शेळके) आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते. इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? असा सवाल त्यांनी केला.
तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही, असा इशाराही शरद पवारांनी दिला.