‘अजित पवार चार महिन्यांत तुरूंगात जाणार’; कोणी केला खळबळजनक दावा?
![Shalinita Patil said that Ajit Pawar will go to jail in four months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Ajit-Pawar-1-1-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यापासून माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील सातत्याने टीका करत आहेत. शालिनीचाई पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार चार महिन्यांत तुरूंगात जातील, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
शालिनीताई पाटील म्हणाल्या, तुरूंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरूंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरूंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही.
हेही वाचा – ‘हिंदू हा धर्म नाही तो एक..’; स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त विधान
देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील. कारण, एकनाथ शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. परंतु, त्यांना सरकार चालवता येत नाही, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या.
राज्यात याचं बंड, त्याचं बंड, ग्रामसेवकांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, मराठवाड्यातला दुष्काळ, त्यामुळे निर्माण झालेले शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा आणि ऊसाचा प्रश्न, अशा कुठल्याही प्रश्नावर मुख्यमंत्रई शिंदेंना तोडगा काढता आला नाही. यंदा महाराष्ट्रात कांद्याचं राज्याच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालं आहे. त्यामुळे तो कांदा निर्यात करायला हवा. परंतु, केंद्राने कांद्यावर निर्यातबंदी लागू केली आहे. ही निर्यातबंदी उठवण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी १० वेळा शब्द दिला. ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले. पण शाहांनी त्यांची भेट घेतली नाही, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या.