‘संजय राऊतांचं आडनाव बदलून आगलावे करा’; शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी!
![Shahajibapu Patil said that the last name of Sanjay Rauta should be changed to Aglave](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/sanjay-raut-and-shahajibapu-patil-780x470.jpg)
संजय राऊत हे मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत, असं मला वाटलं नाही
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपुर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. श्रीकांत शिंदे यांनी माझी जीवे मारण्याची सुपारी दिली आहे असा गंभीर आरोप केला होता. या आरोपावरून आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, खरं तर, या संजय राऊतांचं आडनाव बदलून नामकरण करून संजय आगलावे असं ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एक निष्पाप, प्रामाणिकपणे चांगलं काम करणारं तरूण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदे यांचं आहे. अशा तरूण नेतृत्वावर असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊतांनाच काय, कुणालाच शोभत नाहीत. पण बेभान झालेले संजय राऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम राहिलेला नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती, या रामदास कदमांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू म्हणाले की, संजय राऊत हे मातोश्रीशी कधीच एकनिष्ठ आहेत, असं मला वाटलं नाही. त्यांनी मातोश्रीचं राजकारण उद्धवस्त करण्याचीच सुपारी उचलली आहे. तसेच रामदास कदम यांच्याकडे निश्चित पुरावे असल्याशिवाय असा आरोप ते करणार नाहीत. ते एक जबाबदार नेते आहेत, असंही शहाजी बापू म्हणाले.