सावरकरांकडून नेहमीच भारत तोडण्याचा प्रयत्न, बीजेपी-आरएसएस तेच करतयं; काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश
![http://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/jairam-ramesh-Congresss.jpg](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/jairam-ramesh-Congresss.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सावरकरांनी इंग्रजाची माफी मागितली होती असं विधान केलं होते. ज्यावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांकडून टीकास्त्र डागले जात आहे. यावरून काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पुन्हा वीर सावरकर, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला केला आहे. सावकरांनी नेहमीच भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि भाजप- आरएसएस तेच करत आहे, असं गंभीर टीकास्त्र जयराम रमेश यांनी डागले आहे. मध्य प्रदेशातील खरगावमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसच्या जनआंदोलनाचं महत्त्व सांगताना जयराम रमेश म्हणाले की, आर्थिक आव्हानं, समाजाचं ध्रुवीकरण आणि राजकारणातील हुकूमशाही यामुळे देश तुटत चालला आहे. त्यामुळेच आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.
दरम्यान मागील पत्रकार परिषदेत जयराम समोर यांनी काँग्रेस नेत्यांविषयी खोटं बोलल्याबद्दल भाजपवर हल्लाबोल केला होता. ज्या दिवशी भाजप आणि आरएसएसचे लोक आमच्या नेत्यांबद्दल खोटं बोलणं बंद करतील, तेव्हा आम्ही भाजप नेत्यांबद्दल खोटं बोलणं बंद करु, पंतप्रधान मोदींनी स्वत: भारत जोडो यात्रेच्या पावलावर पाऊल ठेवून दक्षिण भारतातील चार राज्यांचा दौरा केला, पण त्यांनी फक्त काही ठिकाणी फोटो काढले आणि निघून गेले.
दरम्यान सावरकरांविषयीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदार संजय राऊतही संतापले होते. हिंदू नेत्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेमुळं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो, असं राऊत म्हणाले होते.