‘पवार कुटुंबात फूट पडलेली नाही, हे फक्त राजकारणासाठी’; शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचं विधान
![Saroj Patil said that there is no division in the Pawar family](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Saroj-Patil-1-1-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार अशे दोन गट निर्माण झाले आहेत. यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावरून शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
सरोज पाटील म्हणाल्या की, भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना वाटतं. पण बारामतीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. लोकांनी चिंता करू नये. उगीच गट फुटला, पवार कुटुंबात फूट पडली अशी चर्चा करू नका. काही होत नाही. निवडणुका होतील. जे निवडून यायचे आहेत ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून घरात येतो.
हेही वाचा – ‘रूपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते’; जितेंद्र आव्हाडांची टीका
एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन अत्यंत वेगळ्या डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. पण कधीही आमच्या घरात राजकारण आलं नाही. जेव्हा एनडी पाटील निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा माझ्या आईने त्यांना १० हजार रुपये दिले होते. पण आम्ही कधीच राजकारण घरात आणत नाही. शरद पवारांचं मी पाहिलं आहे. स्वत:च्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात सर्वकाही आहे का हे पाहतात. असं सुसंस्कृत कुटुंब असताना तिथे काहीही होणार नाही. मला तसं अजिबात वाटत नाही, असं सरोज पाटील म्हणाल्या.
अजित काय बोलला, श्रीनिवास काही बोलले तर ते राजकारणापुरते आहे. निवडणुका संपल्या की सगळे ढग निघून जातील. राजकीय पातळी सोडल्याचं दु:ख वाटतंय. पण आमच्या आईनं आम्हाला शिकवलंय की रडत बसायचं नाही. कसा तोल सुटतो हे मला कळत नाही. पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली, ते बोलता बोलता आलं असेल. कारण तो संवेदनशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला कदाचित पश्चात्ताप झाला असेल. पण या सगळ्याचं दु:ख नक्कीच झालं, असंही सरोज पाटील म्हणाल्या.