अमित शाह-राज्यपाल भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
![Sanjay Raut's first reaction to Amit Shah-Governor meeting;](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Sanjay-Raut-Amit-Shah-Bhagat-Singh-Koshyari.jpg)
मुंबई |
राज्यात सध्या विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय न झाल्याने आरोप-प्रत्यारोप आहेत. यादरम्यान मुंबई हायकोर्टाने ठराविक काळात निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे, ते त्यांनी विनाविलंब पार पाडावे असा सल्ला दिला आहे. यादरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“काल त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. कालचा हायकोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना समजला असेल. अमित शाह यांनी जसं ३७० कलम हटवत ऐतिहासिक कार्य करुन देशाची वाहवा मिळवली तसं महाराष्ट्रात या १२ आमदारांबाबत जी राजकीय बंदी घातली आहे. ती हटवली पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari met Union Home Minister Amit Shah in New Delhi yesterday pic.twitter.com/mE2IL1iE5S
— ANI (@ANI) August 14, 2021
- राज्यपालांनी राजकारणातील प्यादं होऊ नये
“घटनात्मक पेचप्रसंग राज्यपालांकडून निर्माण होऊ नये असं कोर्टाने सांगितलं आहे. राज्यपालांनी स्वत:ला राजकीय प्यादं म्हणून वापरायला देऊ नये. ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते किंवा संघाचे प्रचारक असू शकतात. त्यावर आमची काही भूमिका किंवा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असतील तर हे या देशाच्या संघराज्यावर हल्ला आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“…तुमचा वापर होऊ देऊ नका”; संजय राऊतांकडून राज्यपालांना आपुलकीचा सल्ला“राजभवनात बसलेल्या व्यक्तीने स्वत:ला राजकीय प्यादं म्हणून वापरु देऊ नये. यामुळे घटनात्मक पदाचं अवमूल्यन आणि अवहेलना होत आहे. हायकोर्टाने प्रत्यक्ष हल्ला केला नसला तरी अप्रत्यक्षे हेच सांगितलं आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.
- पक्षाच्या भूमिकेला, दबावाला अनुसरुन काम
“हे राज्यपाल प्रेमळ आहेत. मी त्यांना ओळखतो. त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. पण ज्याप्रकारे १२ आमदारांसंदर्भात त्यांनी भूमिका घेतली आहे ती राजकीय आहे. ते मनापासून हे करत नसावेत. पण शेवटी त्यांची नेमणूक ज्या पक्षाकडून झाली आहे. त्या पक्षाच्या भूमिकेला. दबावाला अनुसरुन काम करत आहेत. खरं तर त्यांनी दबाव झुगारुन एक स्वाभिमामनी बाण्याचं, घटनेचे रखवालदार असल्याची भूमिका घेतली पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.