नवनिर्माण सेनेचा ‘नमो’निर्माण पक्ष का झाला? ठाकरे गटाचा सवाल
![Sanjay Raut said why Navnirman Sena became Namonirman Party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Raj-Thackeray-and-Uddhav-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे..आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत खोक्याचे राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार मोदी-शाह आहेत. अशावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील. याची उत्तरे त्यांनी दिली पाहीजेत, असं काय झालं की तुम्हाला अचानक महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला. तुमचा नमोनिर्माण पक्ष कसा झाला? नमोनिर्माण होण्याची गरज का पडली? त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत.
हेही वाचा – शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर, सातारा, रावेरचे उमेदवार ठरले; माढ्याचा तिढा कायम
आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपाबरोबर राहिलो नाहीत. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती केली होती. ती युती २५ वर्ष टिकली. पण भाजपाने खरे दात दाखवायला सुरुवात केल्यानंतर आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घेतल्या. जर कुणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर शिवसेना त्याचा प्रतिकार करेल, असं संजय राऊत म्हणाले.
राजकीय व्याभिचार काय असतो? हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणातून समजून घेतले पाहीजे. आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार माननारे लोक आहोत. राज्यातील ओवाळून टाकलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपाने आपल्यात सामावून घेतले. त्यातले हे एक महाशय आहेत का? पण तसे मला वाटत नाही. राज्यातले सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंड यांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणे हा व्याभिचार नाही का? त्याच व्याभिचारी व्यासपीठावर तुम्ही पाऊल ठेवले असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.