दिल्ली मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या नावावर आहे का? संजय राऊतांचा सवाल
![Sanjay Raut said whether Delhi is named after Modi's industrialist friends](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjay-Raut-6-780x470.jpg)
नवी दिल्ली | शेतमालाला किमान हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. मात्र या शेतकरी आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, किमान हमीभावासाठी देशातील शेतकरी राजधानीच्या दिशेने कूच करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर तोफा, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचा मारा केला जातोय. रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. गोळीबार करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. शेतकऱ्यांची वाहनं अवडली जात आहेत. काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान ब्रिटिशांनीही अशा पद्धतीची दमनशाही करण्यात आली नव्हती. तशा प्रकारची दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरोधात करत आहे. ब्रिटिशांच्या काळातही शेतकरी आंदोलन करायचे. त्यांचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले होते.
हेही वाचा – ‘डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा’; शरद पवार यांची मागणी
आतादेखील मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मन:स्थितीत आहे. शेतकरी देशाच्या राजधानीत आपले प्रश्न घेऊन घेऊन येऊ शकत नाही का? देशाची राजधानी मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या नावावर केली आहे का? शेतकऱ्यांना रोखले जात असेल तर ही एका प्रकारची सरकारची हुकूमशाही, एकाधिकारशाही, गुंडगिरी, झुंडशाही चालू आहे, असं संजय राऊत म्हणाले.
स्वामिनथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. स्वामिनाथ यांनी शेतमालासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. त्यात शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी शिफारस केली होती. हे मोदी सरकार २०१४ पासून सांगत आहे की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. शेतकऱ्यांना एकपटही उत्पन्न मिळत नाहीये. पीकविम्याचा बोजवारा उडाला आहे. कोणीही बांधावर जायला तयार नाही. सगळे राजकारणात अडकले आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांना रोखले जात आहे, असंही संजय राऊत म्हणाले.