‘पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा हीच मोदींची गॅरेंटी’; संजय राऊतांची टीका
![Sanjay Raut said that Modi's guarantee is to break the party and do corruption](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjay-Raut-1-1-780x470.jpg)
मुंबई | निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं आहे. अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे. त्याच निकषावर हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. निवडणूक आयोग आता मोदी-शहंचा झालाय, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग आता भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नाही. आता तो मोदी-शाहंचा निवडणूक आयोग झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्र्च्या बाबतीत असे निर्णय घेतले गेले. कारण दोन्ही नेत्यांना महाराष्ट्राचा राग आहे. मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांची वाताहात करुन सूड उगवला. पण महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही.
हेही वाचा – शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाच ‘हे’ असेल नाव
जे शिवसेनेच्या बाबतीत झालं, तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झालं. पक्षाचे संस्थापक निवडणूक आयोगासमोर सुनावणीला बसले आहेत. असं असताना, आयोग संपूर्ण पक्षच जर एखाद्याच्या हातात सोपवत असेल, तर यालाच मोदी गॅरेंटी म्हणातात, असं संजय राऊत म्हणाले.
मोदी गॅरेंटी कोणती असेल, तर पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा, आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर हल्ले करु. तुमच्यामागे ईडी, सीबीआय लावू. तुम्ही तुमचा पक्ष फोडून आमच्याकडे या, तुम्हाला पावन करुन घेऊ. ज्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तो तुम्हाला देऊ. हीच मोदी गॅरेंटी आहे. मोदी-शहा राष्ट्रवादी काँग्रेसला नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणाले होते, तोच पक्ष मोदी-शाहंनी अजित पवारांना दिला, ही निवडणूक आयोग, देशाच्या लोकशाहीची शोकांतिका आहे. हा काळाने उगवलेला सूड आहे, असंही संजय राऊत म्हणाले.