देवेंद्र फडणवीसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे संजय राऊतांची CBI कडे तक्रार दाखल
फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे त्यांच्या पक्षात असणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण मिळलं
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा-पटस सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने आता सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.
संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. मी CBI कडे यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहारांदर्भात ही तक्रार मी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता मी सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघुयात पुढे काय होतंय, असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मी दोन वेळा या प्रकरणाचे डिटेल देवेंद्र फडणवीसांकडे पाठवले. त्यांच्या कार्यालयाची पोचपावती माझ्याकडे आहे. मी भेटीची वेळ मागितली, पण त्यांनी मला अद्याप वेळ दिलेली नाही. मधल्या काळात फडणवीस म्हणाले की मी गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांची अडचण होतेय. माझ्या आशा पल्लवित झाल्या. मी त्यांच्याकडे पुन्हा हे प्रकरण पाठवलं. तेव्हाही त्यावर काही कारवाई झाली नाही. तेव्हा मला लक्षात आलं की फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे त्यांच्या पक्षात असणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण मिळलं. ५०० कोटींचा आर्थिक घोटाळा पुराव्यांसकट मी दिसा असूनही विरोधी पक्षातले नेते निवडून निवडून तुरूंगात टाकले जात आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.