‘सावरकरांबद्दल अपानजनक बोलाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही’; मनसेचा राहुल गांधींना इशारा
![Sandeep Deshpande said that he will not allow him to return to Maharashtra if he speaks disparagingly about Savarkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Rahul-Gandhi-and-Raj-Thackeray-1-780x470.jpg)
मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आली आहे. १७ तारखेला राहुल गांधी यांची मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. स्वा.सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक बोलाल तर खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी पार्क हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर हे या मैदानाच्या जवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुमचं जे म्हणणं आहे ते मांडा, त्याला आमची ना नाही. पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वा. सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अपमानजक वक्तव्य केलं किंवा काही अद्वातद्वा बोललात तर ही महाराष्ट्राची १४ कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. आणि या कोल्ह्यांसोबत जे लांगडे सामील झाले आहेत. त्यांनीपण हे लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही. त्या कोल्हेकुईला साथ देणाऱ्या लांडग्यांनाच सांगतोय. आमचा इशारा आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटालाही सुनावलं आहे.
हेही वाचा – ‘राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..’; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वीर सावकर यांच्या भूमित राहुल गांधी येत आहेत, त्यांचं स्वागत होतं आहे. खरं म्हणजे मनसेने मुंबईवर जे संकट येतं आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा केली पाहिजे. मुंबई गिळली जाते आहे, मराठी माणसावर रोज अन्याय होतो आहे. शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहोत. तो विषय गंभीर आहेत. वीर सावरकर आमचा पंचप्राण आहेत. राहुल गांधी काय बोलतील याची चिंता करण्यापेक्षा मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेत का निघाले? त्याची चिंता केली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.