बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक
पुणे : आधी आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबा आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. आता त्यांच्या या विधानावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे बदनामी करणाऱ्या बागेश्वर धाम नावाचा भोंदू बाबा तु पहिली शिंदेशाही पगडी काड, तुझी पात्रता नाही शिंदेशाही, होळकरशाही पगडी घालायची. ही स्वराज्याच्या मावळ्याची पगडी आहे. शिंदेशाही, होळकर शाही पगडी घालून चमत्कार करणाऱ्याला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही. तसेच वारकरी, स्वयंघोषित पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्या झोपल्या की काय, असा सवाल यावेळी संतोष शिंदे यांनी उपस्थित केलं आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमात बाबा धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, संत तुकारामांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. त्याची पत्नी त्याला रोज काठीने मारायची. संत तुकारामांना कुणीतरी विचारलं होतं की तुझी बायको सगळ्यांना मारते आणि लाज नाही वाटत? ज्यावर संत तुकाराम म्हणाले होते की, ही देवाची कृपा आहे की मला मार खाणारी पत्नी मिळाली आहे. जर आपल्याला प्रेमळ पत्नी मिळाली असती तर आपण देवावर प्रेम केले नसते, आपण आपल्या पत्नीच्या प्रेमात पडलो असतो.





