सचिन वाझे प्रकरण! ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
![The new generation is not aware of the responsibility towards the family - Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/29BMAJITPAWAR.jpg)
मुंबई |
सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. भाजपाने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आज (मंगळवार)माध्यमांसमोर बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. “कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कुणाला काढायचं हे ज्या त्या पक्षाचं काम असतं. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” असं यावेळी अजित पवार यांनी बोलून दाखवलेलं आहे.
अजित पवार म्हणाले, “सुरूवातीपासून मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं महाविकासआघाडी सरकारचं काही कराण नाही आणि सरकार तसं अजिबात करणार नाही. हे मी देखील राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने स्पष्ट करू इच्छितो. एनआयए व एटीएस या दोन्ही तपास यंत्रणा आता चौकशी करत आहेत. त्यामुळे ज्या काही घटना समोर येत आहेत, त्याप्रमाणे त्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल हे मी स्पष्टपणे सांगतो.”
वाचा- मैत्री तोडली म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; तरुणाने घेतलं विष