‘पाण्यासाठी आदिवासी महिलेला मारहाण करून विवस्त्र केलं’; रूपाली पाटलांची सरकारवर टीका
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे असंवेदनशील काम करत आहेत
![Rupali Patil said that Chief Minister and Deputy Chief Minister are doing insensitive work](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/rupali-patil-780x470.jpg)
पुणे : महिला दिनाच्या दोन दिवस आधी पालघर जिल्ह्यात पाणी भरण्याच्या कारणावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. महिला पिण्यासाठी पाणी घ्यायला त्या ठिकाणी आली होती, मात्र तिला पाणी न देता तिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली.
पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरू आहे. पाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करावे लागत आहेत. यावर आता पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपला तो बाब्या आणि दुसरा चं ते कार्ट असं म्हणत रुपाली यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींना जर तुम्ही अशी वागणूक देणार असाल तर तुम्हाला तुमच्या खुर्च्या खाली कराव्या लागतील. सत्ताधारी यांचं काम आहे महाराष्ट्रातील कायद्याचं आणि महिलांचं रक्षण करणं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अतिशय असंवेदनशील काम करत आहेत. स्वतःच्या जवळच्या महिला फक्त त्यांच्या भगिनी आहेत. मात्र ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी हे सरकार काहीच करत नाही, असं रूपाली ठोंबरे म्हणाल्या.