पहाटेचा शपथविधी शरद पवारांची राजकीय खेळी? जयंत पाटलांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
![Rohit Pawar's reaction to Jayant Patal's statement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/rohit-pawar-and-jayant-patil-780x470.jpg)
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी एक राजकीय खेळी असू शकते, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात उत्तम काम करत आहे. जयंत पाटील हे अधून-मधून वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत असतात. त्याला वेगवेगळे अर्थ असतात, मात्र, त्या शपथविधीच्या वेळी नेमकं काय घडलं? हे शरद पवार आणि अजित पवार यांनाच माहिती आहे. ते दोघंही याच्यावर काहीही बोलत नाही. त्यामुळे ही नेमकी कोणाची खेळी होती? हे आजतरी सांगता येणार नाही, असं आमदार रोहित पवार म्हणाले.
आज महाराष्ट्रात शेतकरी, तरूण आणि ग्रामीण भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे सत्तेत असणाऱ्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. विरोधात असणाऱ्यांनीही सत्तेत असणारे लोक हे प्रश्न कसे सोडवतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्व आहे. त्यावेळी मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, असं जयंत पाटील म्हणाले होते.