‘भाजपा महाराष्ट्राला बिहार आणि युपीच्या बरोबरीने घेऊन जातेय’; शरद पवार गटाची टीका
![Rohit Pawar said that BJP is taking Maharashtra along with Bihar and UP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Sharad-Pawar-3-780x470.jpg)
पुणे | इंदापूरमधील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना समोर आली. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपा महाराष्ट्राला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बरोबरीने घेऊन जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, विकासाच्या बाबतीत आपण देशात मागे आहोत. पण गुन्हेगारीमध्ये आपण पुढे गेलो आहोत. अशी परिस्थिती याआधी नव्हती. महाराष्ट्रात दिवसाढवळ्या खून होत असतील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांकडून सत्कार स्वीकारत असतील, गुंड मंत्रालयात रील करत असतील तर या गुंडांना कशाचीही भिती राहिली नाही, हेच यावरून दिसते. जेव्हा भिती नसते तेव्हा दिवसाढवळ्या बंदूक बाळगणे, गोळ्या घालणे, असे प्रकार वाढतात. या सर्व गोष्टींकडे पाहताना भाजपा महाराष्ट्राला कुठे घेऊन जात आहे हे दिसते.
हेही वाचा – मोशी, चिखली, काळेवाडी, थेरगाव, आकुर्डी परिसरात दूषित पाणीपुरवठा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत बोलताना आपण मोक्का कारवाईतून एकाला वाचवल्याची कबुली दिली. यावरून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. काही लोक मोक्का कारवाई रद्द करतात. मात्र, या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या नाहीत. जेव्हा लोकांना अडचणी येतात तेव्हा पोलीस त्यांचे ऐकत नाहीत, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, असं रोहित पवार म्हणाले.
मराठी अस्मिता टिकावी, यासाठी राज ठाकरे यांनी मोठा लढा दिला. त्यांची २०१९ ची भाषणे आपण पाहिली तर भाजपाच्या विरोधात होती. बेरोजगारी हा मुद्दा घेऊन सामान्यांच्या बाजूने ते होते. पण राज ठाकरे यांच्यासारखा मोठा नेता दिल्लीत जात असेल आणि दिल्लीसमोर झुकत असेल तर हे लोकांना आवडणार नाही. त्याबाबतीत त्यांनी पुनर्विचार करावा, असे त्यांचेच कार्यकर्ते बोलत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.