“शिल्लकांनी नको तिथे बोटं खुपसू नयेत, नाहीतर..”मनसेचा आदित्य ठाकरेंना इशारा!
बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर शिवसंवाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये असताना भाषणा दरम्यान ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख करत मनसेवर निशाणा साधला होता. यावरून मनसे आमदार मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
२५ वर्ष आपलीच सत्ता असणाऱ्या आजोळाची (डोंबिवली) दुर्दशा कधी पाहिली? कुठलंही काम न करता % वारी व करून दाखवलं बाता हाच ‘गोठलेल्यांचा’ स्वभाव. त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत. नाहीतर बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे, असं आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, मी नाशिकमध्ये येत-जात असतो. मागील अनेक वर्षांपासून मी या शहरात येतो. माझ्या आजोबांसोबत, वडिलांसोबत मी आलेलो आहे. नाशिक हे माझं आवडतं शहर आहे. नाशिक आणि कोल्हापूर ही दोन शहरं हिरवीगार राहिलेले आहेत. ही शहरं चांगली प्रगत, शांत आणि हिरवीगार राहिलेली आहेत. मात्र मला एक भीती वाटत आहे की मागील १० वर्षांमध्ये नाशिक शहर प्रगतीच्या बाबतीत कुठेतरही हरवलेले होते. अगोदर ब्ल्यू प्रिंट आली, ती कुठे गेली समजली नाही. नंतर नाशिक शहराला कोणीतरी दत्तक घेतले. त्या योजनेचे काय झाले, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.