मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले..
![Raj Thackeray's reaction after Manoj Jarange called off his fast](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Raj-Thackeray-1-780x470.jpg)
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरु केलेलं बेमुदत उपोषण मागे घेतलं. मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरुच राहणार आहे. मात्र आपण सगळ्यांच्या आग्रहास्तव उपोषण मागे घेत आहोत अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी गावातल्या उपोषण स्थळी केली. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.
हेही वाचा – एसटी बसचे तिकीट बुक करणं झालं सोपं! IRCTC च्या वेबसाईटवरून करता येणार तिकीट बुक
आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे. गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा, असं राज ठाकरे म्हणाले.
सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो, असंही राज ठाकरे म्हणाले.