राज ठाकरेंनी केलेले आरोप धादांत खोटे; अजित पवार
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शरद पवारांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
शरद पवारांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. कोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती. ‘जातीच्या राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण सुरु झाले’, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले.
“शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले. राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही. राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आहे. शरद पवारांचे नाव घेतले तर ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतकं दुटप्पीही माणसाने वागू नये”, असे अजित पवार यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या आरोपांवरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.
नेमके काय म्हणाले राज ठाकरे?
जातीच्या राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण सुरु झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाही. याबाबत मी त्यांना मुलाखतीत सुद्धा विचारले होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की, शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार नव्हता का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, मूळ विचार हा शिवरायांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तर मुस्लिम मते जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचे नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचे. तसेच इतर समाज आणि मराठा समाजामध्ये जास्तीत जास्त फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा, असे म्हणत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.