मुंबईतील मोठा प्रकल्प अदाणींनाच का? राज ठाकरेंचा धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर सवाल
![Raj Thackeray said why the big project in Mumbai is for Adani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Raj-Thackeray--780x470.jpg)
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने मुंबईत मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे म्हणाले, मोठा प्रकल्प मुंबईत येतोय. तो मुळात परस्पर अदाणींना का दिला? इथपासून सगळं सुरू होतंय. अदाणींकडे असं काय आहे ज्यामुळे विमानतळ, कोळसा अशा सर्व गोष्टी तेच हाताळू शकतात? टाटांसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी तुम्ही त्यांच्याकडून डिझाईन्स मागवायला हवे होते. टेंडर्स काढायला हवे होते. तिथे नेमकं काय होणार आहे ते कळायला हवं होतं. पण ते झालं नाही.
हेही वाचा – ‘दाऊदचा राईट हँड सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या’; कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक दावा
मला फक्त प्रश्न एवढाच आहे की आत्ता महाविकास आघाडीच्या नेत्यांना का जाग आली? हे जाहीर होऊन ८ ते १० महिने झाले असतील. पण मग आज का मोर्चा काढला? सेटलमेंट व्यवस्थित होत नाही म्हणून का? असा खोचक टोला लगावला.
एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी एक मोकळी जागा लागते. खूप मोठा भाग आहे तो. तिथे किती शाळा, कॉलेजेस होणार आहेत? कसे रस्ते होणार आहेत? इमारतींमध्ये राहणारी माणसं किती आहेत? किती इमारती होणार आहेत? कोणकोणत्या संस्था येणार आहेत? हे सगळं सांगावं लागतं. टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट सांगावी लागते की नाही? कि फक्त एखादा भाग घ्यायचा आणि सांगायचं की हा अदाणींना देऊन टाकला. असं थोडी असतं. आणि हे मोर्चा काढणारे ८ ते १० महिन्यांनी जागे झाले आहेत. यांनी हा प्रश्न विचारला का की नेमकं काय होणार आहे तिकडे? की फक्त मोर्चा काढून दबाव आणून सेटलमेंट करायच्या आहेत? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.