‘गड-किल्ल्यांवर दर्गे आहेत ते हटवले गेलेच पाहिजेत’; राज ठाकरे आक्रमक
मुंबई : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन गटात जोरदार राडा झाला होता. त्यानंतर उरूस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावरून जे काही घडलं त्यावरून राजकारण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, मला वाटतं की परंपरा वर्षानुवर्षे सुरू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. तसंच हा जो काही विषय आहे तो संस्थांनाचा आणि गावकऱ्यांचा विषय आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात. माहीमचा दर्गा आहे मकदुमबाबांचा तिथे उरूस असताना जी चादर चढवली ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्सेबल ती चढवतो. अशी अनेक उदाहरणं देता येतील. मला वाटतं जे परंपरा सुरू ठेवली पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणाका इतका कमकुवत धर्म आपला आहे का? याआधी मी देखील दर्गा, मशिदींमध्ये गेलो आहे. मुस्लिम लोकंही मंदिरात येतात. आपलीच काही मंदिरं अशी आहेत जिथे काही जातींनाच गाभाऱ्यात जाऊ दिलं जातं.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान
मला वाटतं की या प्रकरणी जे वाद निर्माण केला आहे त्या माणसांची वृत्ती कोती झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. इतरांनी त्यात पडू नये, बाहेरच्या लोकांनी पडायची गरज नाही. यामध्ये कुणाला दंगली हव्या आहेत का? मी लाऊडस्पीकरचा विषय काढला, समुद्रातल्या दर्ग्यावर बोललो होतो, जे चुकीचं आहे तिथे कारवाई केलीच पाहिजे. गड-किल्ल्यांवर दर्गे आहेत ते हटवले गेलेच पाहिजेत तिथे त्यांच्या काय संबंध? चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. पण जाणूनबुजून काहीतरी खोदून काढायचा त्याला काही अर्थ नाही. आणखी एक महत्वाचं, मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधीच दंगली होत नाहीत. त्यांचं सगळं बालपण, पिढ्या इतके राहिलेल्या असतात. त्यामुळे अशा प्रकारे जे सामंज्यस आहे ते काही लोकांनी बिघडवू नये, असं राज ठाकरे म्हणाले.