मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संसद भवन सोहळ्यावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
मुंबई : जगभरात आज नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी नव्या संसदेचं उद्घाटन केलं. सेंगोलची लोकसभेत स्थापना करण्यात आली. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनाही करण्यात आल्या. मात्र या सोहळ्यावर देशातील विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन.. भारतीय लोकशाही चिरायू होवो.
हेही वाचा – ‘राज्यात डिसेंबरपर्यंत होणार दीड लाख नोकरभरती’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान, देशातील तब्बल २० विरोधी पक्षातील नेत्यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. बहुतांश विरोधी पक्षांची मागणी होती की, या इमारतीचं उद्घाटन हे राष्ट्रपती द्रौपती मुर्म यांच्या हस्ते व्हायला हवं. तर काही विरोधी पक्षांनी भूमिका मांडली की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या इमारतीचं उद्घाटन करायला हवं. परंतु विरोधी पक्षाच्या विरोधाला सत्ताधाऱ्यांनी जुमानलं नाही.