‘पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही’; राज ठाकरे यांचं सूचक विधान
पुणे : महाराष्ट्र नवनिर्मा सनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका मुलाखतीत शहर नियोजनाविषयी भाष्य करताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरेंनी मुंबई व पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. मुंबईतील रस्ते बांधून बाहरच्यांसाठी सोय करताना तिथल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.पुणे शहर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, प्रत्येकानं आपापला परिसर स्वच्छ ठेवला तरी अनेक गोष्टींमध्ये समाधान मिळेल. माझा विचार फक्त एवढाच होता की मला घरातून बाहेर पडल्यावर मी एका चांगल्या शहरात जगतोय असा मला फील आला पाहिजे. तर त्या जगण्याला अर्थ आहे. धक्के खातोय, फुटपाथवर पाय मुरगळतायत, खड्ड्यातून गाड्या जातायत याला जगणं म्हणत नाही. तुमचा जन्म झालाय म्हणून तुम्ही जगताय. इथल्या अनेक तरुण-तरुणींना परदेशात सभोवतालच्या याच वातावरणासाठी परदेशात जायचंय.
हेही वाचा – चिखली-तळवडेतील प्रस्तावित रस्त्यांना ‘गती’
कालच बातमी आली की मुंबई-पुण्यात प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. का? बेसुमार बांधकाम. मुंबईत कोस्टल रोड, उड्डाणपूल, रस्ते, इमारती बांधल्या जात आहेत. हे रस्ते कुणासाठी बांधले जात आहेत? ही मुंबई शहर वा उपनगरात राहणाऱ्या लोकांनी ही लोकसंख्या वाढलेली नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी तुम्ही तिथे राहणाऱ्या लोकांच्या सर्व सोयी घालवून बसताय, असं राज ठाकरे म्हणाले.
मी गेल्या २५ वर्षांपासून पुण्यात येतोय. मी हजार वेळा सांगितलंय. मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलंय? इथे पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीकडचं पुणे वेगळं, इकडचं पुणं वेगळं, नदीकाठचं पुणं वेगळं, विमाननगरचं पुणं वेगळं.. कुणाचा कशाला काही संबंधच उरलेला नाहीये. पुणं म्हणून कुठे काही राहिलंय? याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाहीये, असंही राज ठाकरे म्हणाले.