मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हे ही मोदी ठरवणार का? राहुल गांधींचा संतप्त सवाल
![Rahul Gandhi said that Modi will decide who should be allowed to enter the temple](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Rahul-Gandhi-780x470.jpg)
Rahul Gandhi | अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काही वेळात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. राहुल गांधी आज आसाममध्ये आहेत. आसाममध्ये त्यांना संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यावेळी मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हे ही मोदी ठरवणार का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, ब्रदर इश्यू क्या है? मला बॅरिकेट्स पाहता येतील का? मला फक्त एक सांगा माझी चूक काय? मला मंदिरात जाण्यापासून का रोखलं जातं आहे? आम्ही कुठलाही नियम मोडलेला नाही. आम्हाला मंदिरात जायचं आहे. पण जाऊ दिलं जात नाहीये. मला परवानगी देण्यात आली आहे. मला निमंत्रणही मिळालं आहे. मला मंदिरात जाऊन हात जोडायचे आहेत. तरीही का अडवलं जातं आहे? असे प्रश्न राहुल गांधींनी सुरक्षा रक्षकांना विचारले. तसंच आज बहुदा एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमध्ये हजारो रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण
#WATCH | On being allowed to enter Batadrava Than in Assam only after 3 pm, Congress MP Rahul Gandhi says "Aaj sirf ek vyakti mandir mein ja sakta hain…" pic.twitter.com/9pz1d6iiuv
— ANI (@ANI) January 22, 2024
आम्ही मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्हाला अडवलं जातं आहे. मात्र त्याचं योग्य कारण दिलं गेलेलं नाही. आम्हाला परवानगी असूनही मंदिरात जाऊ दिलं जात नाही. आम्हाला मंदिरात येण्याचं निमंत्रण मिळालं म्हणून आम्ही आलो आहोत, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला कुणाला बोलवायचं आहे त्यांना बोलवा. आम्ही बळजबरीने मंदिरात शिरणार नाही. ती आमची वृत्ती नाही. सक्तीने काही करणं हे आम्ही करणार नाही. राहुल गांधी शंकरदेव यांचे भक्त आहेत. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहेत पण त्यांना अडवलं जातं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. या सगळ्या प्रकारानंतर राहुल गांधी यांच्या बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे.