संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा; राहुल, प्रियंका, राऊतांसह अनेक खासदार ताब्यात

Rahul Gandhi | लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांबाबत निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अटकाव करत राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील २५ घटक पक्ष सहभागी झाले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी आदींसह जवळपास ३०० खासदार मोर्चात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील एक विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित बोगस मतदारांचा पुराव्यांसह आरोप केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
हेही वाचा : नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संताप व्यक्त करताना संयमी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांनी म्हटले की, ही लढाई राजकीय नाही. संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढतोय असं राहुल गांधी म्हणाले. संविधानाने दिलेले ‘एक व्यक्ती एक मत’ या मूल्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केली.




