पंजाब मंत्रिमंडळ विस्तार; चन्नी सरकारमध्ये १५ मंत्र्यांनी घेतली शपथ, नव्या चेहऱ्यांना संधी
नवी दिल्ली – पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्याच्या एक आठवड्यानंतर, चरणजीत सिंह चन्नी यांनी रविवारी १५ मंत्र्यांना आपल्या नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट करून आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. शपथविधी सोहळा चंदीगडच्या राजभवनात पार पडला.
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नवीन मंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ दिली. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असलेल्या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. चन्नी यांच्या नेतृत्वाखाली पंजाबचे नवीन मंत्रिमंडळ शनिवारी काँग्रेस हायकमांडसोबत तीन फेऱ्यांच्या बैठकीनंतरच अंतिम झाले होते. त्यामुळे शपथ घेणाऱ्या काँग्रेस आमदारांमध्ये ब्रह्म मोहिंद्रा, मनप्रीत सिंग बादल, तृप्त राजिंदर सिंह बाजवा, सुखबिंदर सिंग सरकारिया, राणा गुरजीत सिंग, अरुणा चौधरी, रझिया सुल्ताना, विजय इंदर सिंगला, भारत भूषण आशु, रणदीप सिंह नाभा, राज कुमार वेर्का, संगत सिंग गिलझियन, परगट सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुक्रिरत सिंह कोटली यांचा समावेश आहे.
या १५ मंत्र्यांपैकी आठ जणांनी मागील अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवले होते, तर सात नवीन चेहऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे. ज्या नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, त्यामध्ये परगट सिंग, राज कुमार वेरका, गुरकीरत सिंग कोटली, संगत सिंग गिलजियन, अमरिंदर सिंग राजा वारिंग, रणदीप सिंह नाभा आणि राणा गुरजीत सिंह यांचा समावेश आहे. या सदस्यांनी चंदीगडमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजभवनात मंत्र्यांना शपथ दिली. काँग्रेसचे आमदार ब्रह्म मोहिंद्रा आणि मनप्रीत सिंग बादल यांनी पंजाब सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार तृप्तसिंह बाजवा, अरुणा चौधरी, सुखबिंदर सिंग सरकारिया आणि राणा गुरजीत सिंह हेही मंत्री झाले.आमदार रझिया सुल्ताना, विजय इंदर सिंगला, भारत भूषण आशु आणि रणदीप सिंह नाभा यांनी पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.दरम्यान, गेल्या आठवड्यात पंजाबच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झालेल्या चन्नी यांनी २० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ रचनेवर अंतिम फेरीची चर्चा केली. राष्ट्रीय राजधानीत गांधी आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत नवीन मंत्रिमंडळाची नावे निश्चित करण्यात आली. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर झालेल्या विस्तारामुळे आधीच डावललेल्या आणि कलंकित माजी मंत्री राणा गुरजीत सिंग यांच्या समावेशामुळे असंतोष निर्माण झाला आहे. चन्नी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच काँग्रेसमधील मतभेद समोर आले. इतर बहुतेक तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
आयवायसीचे माजी अध्यक्ष अमरेंद्र सिंह राजा वारिंग यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. राणा गुरजीत यांच्या विरोधात ६ आमदारांनी मोर्चा उघडला. गुरजीतचा मंत्रिमंडळात समावेश न करण्याची मागणी होती. पीसीसी प्रमुख नवज्योत सिद्धू यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसच्या आमदारांनी घोटाळ्याच्या आरोपांचा हवाला दिला आणि राणा गुरजीत सिंह यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये अशी मागणी केली.