महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा! वर्षभरानंतर डाळींच्या दरात ‘इतकी’ घसरण
Pulse Prices | गेल्या एक महिन्यापासून देशातील विविध बाजारपेठांमध्ये डाळींच्या किमती घसरत आहेत. अहवालानुसार हरभरा, तूर आणि उडीद या डाळींच्या किंमती कमी झाल्या आहेत. ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे.
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, तुरीच्या डाळीच्या किरकोळ किमती १६० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्या आहेत. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत ही घट ५.८ टक्के आहे. त्याचप्रमाणे मसूर डाळ महिनाभरापूर्वीच्या तुलनेत १० टक्के स्वस्त होऊन ९० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. प्रमुख बाजारात हरभरा, तूर आणि उडीद डाळीच्या किमती गेल्या एका महिन्यात ४ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटील यांची रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता रॅली
सरकारच्या प्रयत्नांमुळं आयातीत झालेली वाढ हे किंमती कमी होण्याचं मुख्य कारण आहे. डाळींच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं तूर, उडीद आणि मसूर डाळ यांच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं डाळींची आयात वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ४.७३ दशलक्ष टन डाळींची आयात केली होती. जी २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९० टक्के अधिक आहे.
तूर आणि हरभरा डाळीवर सरकारनं ३० सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळं उपलब्धता सुधारण्यासही मदत होत आहे. दुसरीकडे चांगला पाऊस झाल्याने डाळींच्या पेरण्या वाढत आहेत. २ ऑगस्टपर्यंत ११.०६ दशलक्ष हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली होती. जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ११ टक्के अधिक आहे.