“शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके
जेजुरीत दसरा मेळावा ठरला ओबीसींच्या हक्कांचा एल्गार : पवार कुटुंबियांचे जमीन लुटीवर मौन का?

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे ।
राज्याच्या राजकारणात ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असून, ‘मूळ ओबीसी चालवा – प्रस्थापितांना धडा शिकवा’ असा थेट संदेश देत जेजुरी येथील दसरा मेळाव्यात ओबीसी संघर्ष नेत्यांनी राजकीय नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. प्रा. लक्ष्मण हाके यांनी दसरा मेळाव्यात बोलताना शरद पवार यांचे मानसपुत्र विजय कोलते यांनी “जेजुरीतील होळकर घराण्याच्या ऐतिहासिक जागा लाटल्याचा” गंभीर आरोप केला. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती चिंचेची बाग आणि त्यालगतची महत्त्वाची जमीन बळकावल्याचे ते म्हणाले की, “ज्या होळकर घराण्याच्या रक्षणातून जेजुरी नगरी उभी राहिली, त्याच घराण्याच्या जागा लाटून राजकीय नेते मालामाल झालेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी या लुटीवर मौन बाळगले आहे.
ओबीसी संघर्ष योद्धे प्रा. हाके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक तरतुदींचा दाखला देत सांगितले की, “आरक्षण म्हणजे केवळ गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नव्हे. हा सामाजिक समतेचा आणि न्याय हक्कांचा संविधानिक अधिकार आहे.” ते पुढे म्हणाले की, राज्यात १७ आमदार, २ उपमुख्यमंत्री आणि २८ खासदार असूनही ओबीसी समाजासाठी कोणीही ठाम भूमिका घेत नाही. मुख्यमंत्री एक चौथी पास माणसापुढे हतबल होतात, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांना लगावला. राज्यातील जातीयवादी धोरणांवर टीका करत हाके म्हणाले की, “अजित पवार सारथीला कोटींचा निधी देतात, पण ओबीसींसाठी महत्त्वाच्या ‘महाज्योती’ संस्थेला सापत्न वागणूक दिली जाते. हे दुजाभावाचं राजकारण थांबले पाहिजे.”
हेही वाचा : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार; केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

धनगर नेते नवनाथ पडळकर यांच्या पुढाकाराने आयोजित मेळाव्यात राज्यभरातून ओबीसी व धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंचावर एड. मंगेश ससाणे, शिवानंद हैबतपुरे महाराज, स्वप्नील बरकडे, बापू सोनवलकर, समीर मारकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
“गावगाड्याच्या सर्वच पातळीवर प्रस्थापितांचा कब्जा असून, मूळ ओबीसींना राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातून हद्दपार करण्याचे षड्यंत्र सुरू आहे,” असा दावा यावेळी ॲड. मंगेश ससाणे यांनी केला.
पुणे जिल्ह्याच्या नव्या नावाची मागणी
नवनाथ पडळकर यांनी प्रास्ताविकात “पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्याचे नाव ‘मल्हार नगर’ ठेवावे”, अशी मागणी केली. जेजुरीतील होळकर घराण्याच्या ऐतिहासिक वास्तू आणि धर्मस्थळांचे जतन व्हावे, अशीही ठरावात मागणी करण्यात आली. शिवानंद हैबतपुरे महाराज यांनी भाषणात सांगितले की, “बहुजनांचा इतिहास रक्तातून आणि बलिदानातून घडला आहे. न्यूनगंड झटकून नव्या क्रांतीसाठी सज्ज व्हा!” मेळावा संपल्यानंतर हाके, पडळकर यांच्यासह धनगर-ओबीसी बांधवांनी गडावर जाऊन देवदर्शन घेऊन तळीभंडार केला.




