कंठ दाटला, आवाज गहिवरला, सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक
![Prime Minister Narendra Modi emotional while speaking in Solapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Narendra-Modi-3-780x470.jpg)
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गरीबांना घरं उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात विठ्ठलाला नमन करत आणि सिद्धेश्वराला नमन करत केली. यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी भावनिक झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातले एक लाखांहून अधिक गरीब कुटुंब ही आपल्या पक्क्या घरांमध्ये रामज्योती प्रज्वलित करतील याचा मला विश्वास आहे. आज महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये होणाऱ्या दोन हजार कोटींच्या प्रकल्पांचाही शुभारंभ झाला आहे. मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं ते म्हणाले मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. हे ऐकून तर खूप चांगलं वाटतं. मात्र वास्तव हे आहे की महाराष्ट्राचा गौरव वाढतो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि इथल्या प्रगतीशील सरकारमुळे होतो आहे.
हेही वाचा – ‘प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत यायचं असेल, तर..’; काँग्रेस नेत्याचं विधान
प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली आहे. मला आज खूप आनंद होतो आहे की सोलापूरमधल्या गरीबांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं आहे. मी ते काम पाहिलं तेव्हा वाटलं मलाही लहानपणी अशा घरात राहता आलं असतं तर किती छान झालं असतं असं वाटलं. आज मी जेव्हा या गोष्टी पाहतो, तेव्हा मनात खूप आनंद होतो. हजारो कुटुंबांची स्वप्न जेव्हा साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी पुंजी असतात असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले.
मी जेव्हा या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं तेव्हाच तु्म्हाला गॅरंटी दिली होती की तुमच्या घरांच्या चाव्या देण्यासाठीही मी स्वतः येईन. आज मी माझं वचन पूर्ण केलं आहे आणि याचा मला खूप आनंद आहे असंही मोदी म्हणाले. मोदीची गॅरंटी म्हणजे वचनपूर्ती असंही मोदी म्हणाले आहेत.