जागावाटपावरुन महाविकास आघाडीत वाद? प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
![Prakash Ambedkar said that there are differences between the parties in Mahavikas Aghadi over seat allocation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Prakash-Ambedkar-1-780x470.jpg)
Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठक सुरू आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मला मविआ बैठकीबाबत जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि मी एकत्र बसून लवकरच चर्चा करणार आहोत. त्यांच्यात सध्या काही जागांवरून भांडण चाललंय, तसेच इतरही काही विषय आहेत ज्याची मला माहिती दिली जाणार आहे. मविआत ते आम्हाला किती जागा देऊ शकतात, कोणत्या जागा देऊ शकत नाहीत. आम्ही किती जागा मागणार यावर ही चर्चा अवलंबून आहे. खरंतर, त्यांचंच (मविआ) काही ठरत नाहीये. त्यामुळे त्यांच्यात जी चर्चा आहे त्यात वंचितची काहीच भूमिका नाही.
हेही वाचा – भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर, फॉर्म्युलाही ठरला; राष्ट्रवादी व शिवसेनेला मोजक्या जागा!
महाविकास आघाडीत जागांसदर्भात आतापर्यंत काही निर्णय झाला आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, त्यांचीच भांडणं आहेत…मी तुम्हाला त्यांच्या भांडणांसदर्भात सांगतो. त्यामुळे तुम्ही प्रसारमाध्यमांनी वंचितच्या मागे लागणं जरा थाबवलं पाहिजे. तुम्ही बातम्या देताना वंचितच्या मागे लागत आहात अशी परिस्थिती आहे. १० जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मतभेद आहेत. तर पाच जागा अशा आहेत जिथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असून त्यांचं तिथे काही ठरलेलं नाही.
राज्यातल्या एकंदरीत लोकसभेच्या १५ जागा अशा आहेत ज्यावर मविआ नेत्यांचं एकमत झालेलं नाही. ही आमची माहिती मी तुम्हाला दिली आहे. मविआतील त्या तीन पक्षांचं ठरत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागेंमधील एखादी जागा आम्ही मागायची ठरवली तर नेमकं कोणाशी बोलायचं तेच ठरलेलं नाही. त्यामुळे या १५ जागांचा तिढा सुटल्याशिवाय ते लोक आमच्याशी बोलू शकत नाहीत आणि जागावाटपाचा निर्णय होऊ शकत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.