‘पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची माफी मागावी..’; प्रकाश आंबेडकर यांची मागणी
![Prakash Ambedkar said that Prime Minister should apologize to NCP and Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Prakash-Ambedkar--780x470.jpg)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी मागणी केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतरही या आरोपासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. पंतप्रधानांच्या वक्तव्याची नोंद झालेली असते. यंत्रणा त्या अनुषंगाने तपास करत असतात. कारवाई होत नसेल तर पंतप्रधानांनी खोटे आरोप केले असा अर्थ होतो. सरकारने दहा दिवसांत गुन्हा दाखल करावा, अन्यथा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांची माफी मागावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
हेही वाचा – Tesla : टेस्लाचं भारतातील पहिलं ऑफिस पुण्यातीय ‘या’ ठिकाणी होणार
सध्याच्या राजकारणात पक्ष देशव्यापी असले तरी देशव्यापी राजकारणाचा अस्त झाला आहे. हा बदललेला कॅनव्हास ‘इंडिया’ व्यासपीठ विचारात घेणार आहे का? असा सवाल उपस्थित केला. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांना राष्ट्रीय पक्षांनी गरज उरलेली नाही. हा बदलेला राजकीय पट ‘इंडिया’ व्यासपीठ विचारात घेणार आहे का? ‘इंडिया’ व्यासपीठाबाहेरचे पक्ष आपआपल्या राज्यात बळकट आहेत. ते आपल्या राज्याचा विकास करू शकतात. इंडिया आघाडीने मणिपूर प्रश्न गंभीरपणे मांडला नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोणाच्या कबरीवर फुले वाहू शकत नाही, असा कायदा दाखवावा. औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने उदात्तीकरण होते, हा गैरसमज आहे. औरंगजेब येथील शासक होता. कोरेगाव भीमा दंगलीत गुन्हेगार असलेल्या मिलिंद एकबोट यांना अटक होते. पण, संभाजी भिडे यांना अटक होत नाही. याचा अर्थ सरकारचे त्यांना अभय आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.