‘राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात कमकुवत पक्ष’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादीत जयंत पाटलांप्रमाणे अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपात या, तर ते भाजपात जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरूगांत जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय घटक कोणता असेल, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
हेही वाचा – ‘शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे’; एकनाथ शिंदे
सोबतच प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंनाही टोला लगावला आहे. नाना पटोलेंची वक्तव्य म्हणजे इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे कधी गरम तर कधी नरम हवा निर्माण करणारी आहेत. नागपूरात ते म्हणाले स्वतंत्र लढायचं. मविआच्या बैठकीत म्हणतात एकत्र लढायचं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानांकडे लक्ष ठेवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.