‘स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठीचे नियोजन करा’; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-1-2-780x470.jpg)
पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांबरोबर ग्रामविकास विभागाची ‘निर्मलवारी’ यंदाही जाणार आहे. ही निर्मलवारी स्वच्छ व सुरक्षितपणे पार पडली पाहिजे. यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करावे. या पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी बारकाईने नियोजन करा, असा आदेश राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता.१९) वारीशी संबंधित सर्व जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पालख्यांबरोबर जाणाऱ्या निर्मलवारीची पूर्वतयारी पाहण्यासाठी महाजन आणि आज पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. याशिवाय सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
महाजन पुढे म्हणाले, ‘‘यावर्षी पालखी सोहळ्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पालखी सोहळ्यासाठीची आवश्यक सर्व कामे ही पारदर्शक आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पंढरपूर येथे पालखी तळावर पुरेशा प्रमाणात आणि मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवाव्यात’’.