‘OBC तून मराठा आरक्षण देणं अशक्य’; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान
मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज आरक्षणाचा १० वा दिवस आहे. राज्य सरकारकडून वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. मात्र, वंशावळ शब्द काढण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ही परिक्रमाच होती. श्रावणात दुर्गापरिक्रमा करावी असं म्हणतात. खूप वर्षं ऐकत होते. यावेळी ठरवूनच टाकलं की करुयात. प्रचंड चांगला प्रतिसाद होता. मराठा आरक्षणाचा विषय सध्या सगळीकडे चर्चेत आहे.ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी कोणती मागणीच नव्हती.
हेही वाचा – चक्क पक्ष्यासारखा हवेत उडणारा ‘हा’ मासा तुम्ही कधी पहिला आहे का?
मुळात मराठा समाजाची ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी काही मागणी नव्हती. त्यांची साधी मागणी होती की त्यांना आरक्षण मिळावं. त्यांच्यातला जो समाज वंचित राहिला आहे, त्यांना आरक्षण देण्याला सगळ्यांची मान्यता होती. गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या नेत्यांची त्याला मान्यता होती, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आमची भूमिकाही पहिल्यापासून स्पष्ट आहे. आमचं मराठा आरक्षणाला समर्थन आहे. पण असं कोण म्हणालं की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या? असं शक्य नसतं. संविधानाच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. मराठा समाजाला खरं खरं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.