पवारांच्या आशीर्वादानेच मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष, आता पवार विरुद्ध पवार…; फडणवीस यांचा टोला

मुंबई : अजित पवार यांना सोबत घेऊन आपण कोणताही बदला घेतला नाही. कोणताही सूड उगवला नाही. आमचं तसं राजकारण नाही. आम्ही फक्त संधीचा फायदा झाला, असं सांगतानाच शरद पवार यांच्या आशीर्वादानेच या महाराष्ट्रात मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहायला मिळाला. इतरही अनेक घराण्यात असेच संघर्ष पाहायला मिळाले. आता जर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष होत असेल तर याला कालचक्रच म्हणता येईल, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राजकारणात असं होतं. पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला. अनेक घराण्यात संघर्ष पाहावे लागले. पवारांनी अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले. हे कालचक्र आहे. काहीच नाही दुसरं. कालचक्र आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – रुपाली चाकणकर यांचा अमोल कोल्हेंना टोला
शरद पवार यांचं पर्व वगैरे होतं असं काही मानत नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी एक काळ गाजवला आहे. आजही ते संघर्ष करत आहेत. आज लोकांना देशात एकच नेतृत्व मोठं वाटतं. आश्वासक वाटतं. ते म्हणजे मोदींचं. मोदींवर लोकांचा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अजितदादांना सोबत घेऊन तुम्ही बदला घेतलाय का? असा सवाल करण्यात आला. त्यालाही फडणवीस यांनी उत्तर दिलं. मी स्वत:ला चाणक्य समजत नाही. शरद पवार चाणक्य असतील. मी नाही. कोणी जर धोका दिला, विश्वासघात केला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे हे मी राजकारणातच शिकलो आहे. राजकारणात अपमान होत असतात. अपमान सहन करता येतात. विश्वासघात सहन करायचा नसतो. पण म्हणून मी बदला घेतला असं म्हणणार नाही. संधी मिळाली तर फायदा घेतला पाहिजे. तोच फायदा मी घेतलाय, असं सांगतानाच हा पोएटीक जस्टीस आहे. हे कालचक्र आहे. कराल तसं भरावं लागतं. मी ईश्वरावर भरोसा ठेवणारा आहे. विश्वासघात होतो तेव्हा कालचक्र उत्तर देतं. मी उत्तर दिलं नाही. कालचक्राने दिलं, असंही त्यांनी सांगितलं.