“शिर्डीत प्रसादाचा एकच लाडू”; इंधन टंचाईवरून संजय राऊत यांची मोदींवर बोचरी टीका

Sanjay Raut | देशात एलपीजी आणि इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नसून विरोधक जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवलं पाहिजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा विधानांचे समर्थन करू नये.
खासदार संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवलं पाहिजे. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचं समर्थन करु नये. गेल्या काही काळात भारताला जी मानहानी पत्करावी लागली आहे त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे माहीत आहे. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर मोदींकडे असती तर इराणमध्ये आणि इस्रायलमध्ये हजारो निरपराध लोकांचे प्राण गेले नसते. दोन देशांमधल्या देशाला संघर्षाला जबाबदार मोदींचे मालक डोनाल्ड ट्रम्प आहे. बॉम्ब वर्षाव वगैरे सुरु आहे. मात्र नरेंद्र मोदींनी तोंडातून एक शब्दही काढलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना ट्रम्प यांच्या दबावामुळे अचानक ऑपरेशन सिंदूर मागे घेतलं. जर ऑपरेशन सिंदूर थांबवू शकतात आणि दबाव नव्हता तर मोदींनी युद्ध थांबवण्यासाठी दबाव का आणला नाही? रशिया, चीन जर व्यक्त होत आहेत तर इराण आणि इस्रायलबाबत मोदी गप्प का बसले आहेत? असा सवाल राऊत यांनी केला.
हेही वाचा : कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राला अखेर सुरुवात
अमेरिकेने भारताबरोबर केलेला व्यापार करार ही भारताची बदनामी आहे. ज्या दळभद्री अटी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, भारताचं नुकसान होतं आहे. डोनाल्ड ट्रम्प सांगतोय की कुणाकडून तेल घ्यायचं, इतर गोष्टी घ्यायच्या. याला काय म्हणायचं? हा सन्मान आहे का? जर काँग्रेस बदनामी करतं आहे असं मुख्यमंत्री म्हणत आहेत तर मग देशाची प्रतिष्ठा उंचावली पाहिजे म्हणून मोदी काय करत आहेत? आजही एलपीजीसाठी रांगा लागल्या आहेत. तरीही मोदी आणि फडणवीस सगळं आलबेल आहे असं सांगत आहेत. शिर्डीतल्या साई संस्थानने प्रसादाचे दोन लाडू देण्याऐवजी एक लाडू देण्याचाच निर्णय घेतलाय. का? इंधन नाही, गॅस नाही म्हणून. हे तरी मान्य करा, तिथे तरी खोटं बोलू नका. भक्तांना जे जेवण मिळत होतं तिथे दोन पोळ्यांऐवजी एक पोळी देत आहेत. कारण इंधन नाही, गॅस नाही. देवासमोर तरी खोटं बोलू नका. हे हिंदुत्ववाद्यांना मी सांगू इच्छितो की देशातल्या सगळ्या देवस्थानांमध्ये हीच स्थिती आहे. मुंबईतली ४० टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. ही कुणाची बदनामी आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.





