लोकसभा निवडणुकीसाठी आता उरले फक्त ४०० दिवस… पंतप्रधान मोदींनी दिला खासदारांना कानमंत्र
![Only 400 days left for the Lok Sabha elections... Prime Minister Modi gave an ear mantra to the MPs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Modi-774x470.jpg)
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीसाठी अवघे चारशे दिवस उरले आहेत असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना गुरूमंत्र दिला आहे. भाजपाच्या संसदीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी खासदारांना कानमंत्र दिला आहे. जर तुम्ही जनतेशी कनेक्ट राहिलात तर अँटी इन्कबन्सी होणार नाही. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहा. खासदारांनी आपल्या आपल्या मतदार संघांमध्ये गेलं पाहिजे तसंच लोकांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजेत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे नरेंद्र मोदी यांनी?
भाजपच्या संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आपण अमृतकाळातला अर्थसंकल्पही सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सगळ्या घटकांना विचारात घेऊन तयार करण्यात आला आहे. यावर लोक टीका करत आहेत की हे निवडणुका समोर ठेवून सादर करण्यात आलेलं बजेट आहे पण तसं अजिबात नाही. गरीब लोक, मध्यमवर्गीय, नोकरदार या सगळ्यांचा विचार करून हे बजेट सादर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना आपल्या आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधायला सांगितलं आहे.
२०२४ च्या लोकसभेची तयारी सुरु
२०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. भाजपा असो किंवा इतर पक्ष असोत सगळ्याच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तसंच यावर्षी ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. याच अनुषंगाने मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर आता यावर स्पष्टीकरण देत आम्ही सामान्य माणसाला दिलासा देणारं बजेट सादर केल्याचं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिपुरा विधानसभेसाठी प्रचार करणार आहेत. ११ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅली आहेत. त्यांची पहिली रॅली गोमती जिल्ह्यात होणार आहे. तर दुसरी रॅली धलाई या ठिकाणी होणार आहे.