मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश! २१ व्या दिवशी धनगर समाजाचं उपोषण मागे
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
२१ सप्टेंबरला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार आणि सर्व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांची मुंबईत बैठक झाली. राज्य सरकारने त्यांच्या मागणीला न्याय म्हणत एकमताने पाठिंबा दिला. या आरक्षणासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. काही गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत. त्या गोष्टी सोडवण्यासाठी शासन अतिशय गंभीर आणि कटिबद्ध आहे, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची तीव्र नापसंती; म्हणाले..
आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांची होती. त्यांची मागणी मान्य करण्यात आलीय. आवश्यकता भागल्यास धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल, असंही सांगितलं होतं. शासन आपली कारवाई पूर्ण करत आहे. ५० दिवसांच्या आत ही सर्व कारवाई पूर्ण करावी, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. ती मागणी मान्य केलीय. धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणाने लागू करण्यात आल्या आहेत, असंही गिरीश महाजन म्हणाले.