‘मंदिरांमध्ये महिलांनाही पुजारी म्हणून परवानगी दिली पाहिजे’; नीलम गोऱ्हेंची मागणी
८ मार्च रोजी राज्य सरकार नव्याने महिला धोरण आणणार
मुंबई : ८ मार्च ला महिलादिनी राज्य सरकार नवीन महिला धोरण अमलात आणणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून मसुदा सरकारकडे दिला पाहिजे. तर, शिंगणापूर या ठिकाणी जसे महिलांना चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्याचा मान मिळतो, त्याप्रमाणे तुळजापूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांमध्ये पुरूष पुजाऱ्यांच्या बरोबरीने महिलांनाही पुजारी म्हणून परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्या नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
राज्य सरकारने नव्याने महिला धोरण आणण्याचा निर्णय घेतला असून, ८ मार्च रोजी हे धोरण आणले जाणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून महत्वाचे मुद्दे शासनाला सादर केल्यास त्यावर चर्चा होऊ शकेल. मीसुद्धा यात काही बदल सुचवले आहेत, तर काही मुद्दे नव्याने समाविष्ट करण्याच्या लेखी सूचना केल्या आहेत. महिलांनी नोकरी करताना आरक्षण वयमर्यादा वाढवून द्यावी, वृद्ध महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, शक्ती कायद्याची अंबलबजावणी करावी, अशी मागण्या नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.
कोरोनात अनेक महिला विधवा झाल्या, तर शेतकरी आत्महत्या करती असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघडण्यावर पडले आहेत. त्यामुळे साईबाबा संस्थानने अशा मुलांसाठी शैक्षणिक मदत, निवासी संकुल उभारून त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या.
पत्रकार वारिशे प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या की, वारिशे यांच्या हत्येची चौकशी एसआयटी मार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली आहे. या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, मीही माझ्या निधीतून ५१ हजार रूपयांची मदत देणार आहे. पत्रकारांवर हल्ले ही बाब अतिशय गंभीर आहे. यासंदर्भात कडक कायदा व्हायला पाहिजे. या घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचं आहे, असंही गोऱ्हे म्हणाल्या.