राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाकडून जामीन
![NCP leader MLA Jitendra Awad granted bail by Thane court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Awhad-Jitendra-700x470.png)
- १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन
ठाणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कालच्या अटकेनंतर आव्हाडांना आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दुपारी जामिनासंदर्भात झालेल्या सुनावणीत आव्हाडांसह इतर १२ जणांना जामीन मिळाला आहे. ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा आव्हाडांनी प्रयत्न केला होता. यादरम्यान जरासा राडाही झाला होता. याच प्रकरणावरुन आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला होता. काल सायंकाळी ४ वाजता आव्हाडांना अटक झाली होती.
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि ११ कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले होते. आव्हाड यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत होत्या. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच पोलिसांकडून कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते.
आज सकाळी आव्हाडांना जेल की बेल यावर न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या निर्णयानंतर आव्हाडांनी तत्काळ जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर केला.
नेमकं काय घडलं होतं?
ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घेऊन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बाहेर लावल्याने वादाचे प्रसंग घडला. यात कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात झटापट झाली. यामध्ये एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. या प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्यांना पोलिसांनी अटक केली होती.