“नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच,” चंद्रकांत पाटलांचं एकनाथ खडसेंबद्दल मोठं विधान
!["Nathabhau is still our guardian," Chandrakant Patil's big statement about Eknath Khadse](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Eknath-KHadse-Chandrakant-Patil-1.jpg)
पुणे |
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीसंबंधी बोलताना नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच असल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे का? असं विचारण्यात आलं असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, “भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही.
भेटीगाठी वेगवेगळ्या कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, अनेकजण भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहे. त्यांची इच्छाशक्ती एवढी दांडगी आहे की आजारी असतानाही कामकाज सुरु आहे. आजारी होते म्हणूनच देवेंद्र फडणवीस त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते”. पुढे ते म्हणाले की, “यानंतर एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिल्याचा विषयही असाच आहे. या महाराष्ट्राने आपण एकमेकांचे शत्रू जरी असलो तरी त्या भागात असलो तर भेटायला जायचं ही संस्कृती आहे. नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच आहेत. त्यांच्या घरात तर भाजपाच्या खासदार आहेत. प्रामुख्याने रक्षाताईंना भेटायला ते गेले होते. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे फडणवीस आहेत त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही”.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद https://t.co/wm1OwcZnjR
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 3, 2021
भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर टीका केल्यासंदर्भातही पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. “शरद पवार हे सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी चर्चा करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला पावलावर जाणवतंय की, चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.