‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले..
![Narendra Modi said that people are trying to ban the film](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Narendra-Modi-2-780x470.jpg)
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वाद सुरू आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखल यावरून प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट केरला स्टोरी सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रम आणि प्रतिभावान असतात. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.
बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांशी मागल्या दराने राजकीय सौदेबाजी देखील करत आहे. म्हणूनच कर्नाटकमधील लोकांनी या काँग्रेसपासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक चित्रपटावर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला असं काही करताना पाहतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.