‘धीरेंद्र शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमाल परवानगी देऊ नका; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणं
मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतील कार्यक्रमांला परवानगी देऊ नका, अशी विनंती केली आहे. हा कार्यक्रम १८ आणि १९ मार्च रोजी मुंबईतील मीरी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
नाना पटोले यांनी पत्रात लिहलं आहे की, महाराष्ट्र हो पुरोगामी राज्य आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांसाठी या राज्यात जागा नाही. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रामाला राज्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रामाला परवानगी दिली जाऊ नये.
बागेश्वरसारख्या मानसिकतेच्या लोकांना सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकार स्वत:च अशा लोकांना पाठिंबा देऊन राज्यातलं वातावरण बिघडवत असेल तर ही गोष्ट राज्यासाठी चांगली नाही, असं नाना पटोले म्हणाले.