‘जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ’; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर
ओतूर : ‘‘माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी मी अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभर वेळा अस्वस्थता दाखवेन,’’ असे सडेतोड प्रत्युत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. त्यात आम्ही तडजोड करणार नाही. जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आले, ते आता माझ्याबद्दल म्हणाले,‘ ४५ वर्षे एक आत्मा भटकत आहे. त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी.’ पण, मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन.’’
हेही वाचा – जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी
शरद पवार म्हणाले…
पंतप्रधान काल म्हणाले, ‘ईडीचा मी एक टक्काही वापर करत नाही.’ आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा, पण तुम्ही देशात हुकूमशाही वापरत आहात.
जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साधा माणूस, मात्र त्यांनी विरोध केला म्हणून त्यांना तुरुंगात टाकले.
लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर लोकांचा विश्वास असतो. मात्र, विचारधारा वेगळी म्हणून त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता.
मोदी २०१४ ला म्हणाले, ‘सहा महिने द्या सिलिंडर, तेल व इतर सर्वांचे दर निम्म्याने कमी करून महागाई कमी करू.’ मात्र, महागाई वाढलीच आहे.
महागाई वाढली आहे. संसार प्रपंच करणे अवघड झाले आहे. सत्तेत तुम्ही दहा वर्षांत काय केले?
धरणांमुळे जुन्नरचा चेहरामोहरा बदलला. शेतीतील प्रगतीमुळे येथील शेतकरी देशाची भूक भागविण्याचे काम करीत आहे. परंतु, जुन्नरमधीलच एक मुंबई येथील व्यापारी पानसरे यांना अटक केली. जे चांगले काम करतात त्यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो.
– शरद पवार, ज्येष्ठ नेते