जे जे अमंगल ते नष्ट होवो! ‘वर्षा’ निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापनेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रार्थना
मुंबई |
राज्यासह देशभरात आज मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. “जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो”, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाच्या चरणी केली आहे. राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी असं आवाहन केलं आहे की, “करोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत.
- दोन वर्षापासून करोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या!
“आजपासून श्री गणरायाचं आगमन होत असून जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून करोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
- विघ्नहर्ता हे संकट कायमचं दूर करेल!
करोनाच्या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू अशी आशा व्यक्त करताना पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की, “कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे. गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल अशी मला खात्री आहे.”
- आजच्या मंगल दिनी ‘ही’ शपथ घेऊया!
“लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं होतं. आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील करोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून करोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूयात. आजच्या या मंगल दिनी आपण ही शपथ घेऊया”, असंही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.