मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय बोलणं झालं? मनोज जरांगे पाटील म्हणाले..
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोन करून चर्चा केली आहे. दोघांमध्ये २४ मिनिटे चर्चा झाली. यावर मनोज जरांगेंनी भाष्य केलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोनवर आरक्षणावरच चर्चा झाली. दुसरी कुठलीही चर्चा झालेल नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. त्या समितीचा प्रथम अहवाल स्विकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्माण त्यांनी घ्यावा. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं.
हेही वाचा – खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का? संजय राऊतांचा सवाल
आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि ते तुम्ही देऊही नका, असं मी स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही आमची बैठक बोलावली आहे. आम्हीही त्यावर चर्चा करणार आहोत. कुणबी आणि मराठा एकच असल्याचा २००४ चा जीआर आहे. त्यामुळे जीआर दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.